दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका
![]()
अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. गेल्या २० ते ४० दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच भयावह झाली आहे. गावात पाठवण्यात आलेल्या टँकरमधील पाणीही दूषित आणि पिवळसर आहे. त्यामुळे नागरिकांना ते वापरणेही धोकादायक ठरत आहे. गावालगतच्या विहिरीतील शेवाळयुक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. दरम्यान, गावचे सरपंच विनोद सोळंके यांनी गावात पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्ष गावात जाऊन शहानिशा केली असता परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे समोर आले. गावातील अनेक भागांत नळ कोरडे पडले आहेत. पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नसल्याचे वास्तव दिसून आले. ग्रामस्थांवर दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. महिलांना भर उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील गरीब नागरिकांकडे ना वाहनांची सोय आहे, ना पाणी साठवण्याची क्षमता आहे. काही जण मजुरी सोडून पाण्यासाठी फिरत आहेत. काहींना दूषित पाणी पिऊन आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. मतदानाच्या वेळी गाव आठवते. संकटात कोणीच फिरकत नाही, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान, दहीहंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. तहानेने होरपळणाऱ्या पातोंडा गावाला तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करावा. कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ^ गाव खारपानपट्ट्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गावाला पिण्याचे शाश्वत पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मदत करावी. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने मी पाठपुरावा करणार आहे. – विनोद सोळंके, सरपंच, पातोंडा. चार महिन्यांपासून पाणी नाही; रोज होते वणवण ^गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीच नाही. रोज पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. – ज्योती भोंडे, ग्रामस्थ. दोन टँकर आले, तेही दूषित ^गत ४० दिवसांपासून गावात पाणीच नाही. दोन टँकर आले; पण त्यातील पाणीही दूषित होते. पाण्यासाठी लोकांची भर उन्हात फरफट सुरू आहे. प्रशासनाने आमच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. पाणी नियमित देण्यात यावे. – प्रमोद टाकसाळे, ग्रामस्थ, पातोंडा. भर उन्हात एक किमीवरुन आणते पाणी ^गावात आलेले पाणी पिवळ्या रंगाचे आणि पूर्ण खराब होते. भर उन्हात किलोमीटर अंतरावर खोबरखेडच्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. महिलांची अक्षरशः फरफट होत आहे. – ताराबाई गावंडे, ग्रामस्थ.
