जळगावच्या सराफा दुकानातील कचऱ्याचे दर 20 हजारांनी वाढले:एका काेठीभर कचऱ्याला मिळताेय 70 हजार रुपये वार्षिक माेबदला
![]()
सोन्याच्या दराने नवनवीन शिखरे गाठलेली असतानाच, सुवर्णनगरी जळगावच्या सराफा बाजारात एक थक्क करणारी आर्थिक तेजी पाहायला मिळत आहे. इथे केवळ सोन्यालाच नाही, तर दागिने घडवणाऱ्या तब्बल १० हजार कारागिरांच्या घरातील कचऱ्यालाही सोन्याचे मोल आले आहे. यंदा या कचऱ्याच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, ५० किलो क्षमता असलेल्या एका कोठीसाठी व्यापाऱ्यांकडून कारागिरांना वर्षाकाठी तब्बल ७० हजार रुपये मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २० हजारांची वाढ झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादपासून ते महाराष्ट्रातील सांगली-मलकापूरपर्यंतचे मोठे व्यापारी वर्षभरापूर्वी बुकिंग करून हा कचरा विकत घेण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीत येतात. वर्षाकाठी १२५ टनांपर्यंत कचरा विक्री होत असतो. खरेदीदार प्रक्रिया करून या कचऱ्यातून सोन्याचे कण वेगळे काढून घेतात. कारागिरातर्फे १ किलो सोन्याच्या वीट, लगडपासून दागिने घडवताना १० ग्रॅम सोन्याचे कण कचऱ्यात जातात. यातील मोठे कण जमा होतात तर बारीक तसेच राहतात. झाडू मारून जमा केलेला कचरा ५० ते १०० किलोच्या कोठीत संकलित केला जातो.
