पुण्यात आगामी काळात पाणी संकट गडद होण्याची शक्यता:एल निनोचा फटका बसणार? धरणसाठा झपाट्याने घटला, पुढचे दिवस कठीण
![]()
पुणेकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली असून वाढत्या उष्णतेमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसराला पाणी देणाऱ्या धरणसाखळीतील साठा धोक्याच्या पातळीपर्यंत घसरू लागल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत पावसाने उशीर केला तर पुण्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रशासनाने सध्या तरी नागरिकांना दिलासा दिला असून 31 मेपर्यंत शहरात कोणतीही पाणीकपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांवर उन्हाळ्याचा मोठा परिणाम दिसू लागला आहे. एकीकडे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे धरणांमधील उपलब्ध साठा कमी होत चालला आहे. विशेषतः खडकवासला धरण साखळीतील परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ 26.61 टक्के म्हणजेच 7.76 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा 21.95 टक्के म्हणजे 6.40 TMC होता. यंदा साठा तुलनेने जास्त असला तरी वाढत्या उष्णतेमुळे तो झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहू शकते किंवा मान्सून उशिरा सक्रिय होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर पावसाने दिरंगाई केली तर पुणे शहराला पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. नुकतेच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही याबाबत भाष्य केले होते. त्यांनी शहरात तातडीने पाणीकपात लागू केली जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, पुढील काळात पाण्याची कमतरता भासू शकते, त्यामुळे प्रशासन नियोजन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील साठा चिंताजनकरीत्या कमी होत चालला आहे. वरसगावमध्ये 3.16 TMC, पानशेतमध्ये 3.50 TMC आणि खडकवासलामध्ये 1.10 TMC पाणी उपलब्ध आहे. पवना धरणात 2.66 TMC, भामा आसखेडमध्ये 2.92 TMC, निरा देवघरमध्ये 2.88 TMC तर वीर धरणात 5.20 TMC साठा आहे. मुळशी धरणात 5.47 TMC पाणी असून उजनी धरणाचा साठा -7.68 TMC इतका नोंदवला गेला आहे. काही धरणांमधील साठा अत्यंत कमी झाल्याने भविष्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याचा वापर जपून करण्याची गरज सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील काही आठवडे पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मान्सून वेळेत दाखल झाला तर संकट टळू शकते, अन्यथा पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष येणाऱ्या पावसाकडे लागले आहे.
