सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात? चर्चा रंगताच डॅमेज कंट्रोल प्लॅन; सुनील तटकरेंसोबत सविस्तर चर्चा
![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या चर्चेमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नाराजी आणि संभ्रम दूर करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्ष संघटनेतील विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी त्या आता सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावरून पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यात अस्वस्थता असल्याचे बोलले जात होते. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख नसल्याने पक्षात नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावांसमोर मात्र पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. या प्रकारानंतर पक्षातील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्यांनी सुनील तटकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. सध्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काही बदल करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यकारिणीतून काही नावं वगळण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला. एका महिला लोकप्रतिनिधीसह सुबोध मोहिते यांना कार्यकारिणीतून बाहेर करण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष संघटनेत समतोल राखण्यासाठी आणि नाराजी कमी करण्यासाठी हे बदल केले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, अजित पवार गटातील 22 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी दोन्ही गटांच्या भविष्यातील राजकीय भूमिकांबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या विषयावर शरद पवार यांनी मौन बाळगल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने आमदार-खासदार नाराज दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये सध्या राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी राज्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील या हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षातील नाराजी, कार्यकारिणीतील बदल, वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि विलिनीकरणाच्या चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सुनेत्रा पवार आता पक्षातील नाराजी नियंत्रणात आणण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
