शेतकऱ्यांवर मोठा अन्याय:उत्पादन खर्च 20 रुपये अन् खरेदी दर फक्त साडेबारा रुपये, लासलगावातून रोहित पवार आक्रमक

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-18t093952591_1779077449.jpg




केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1235 रुपये (12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो) या अत्यंत तोकड्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा खरेदी दर अत्यंत अपुरा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे लासलगाव येथे दाखल झाले असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. रोहित पवार म्हणाले, आज जो शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे तो अन्याय कमी झाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी स्वतः कष्टाने पिकवलेला कांदा आहे त्याला कुठे तरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये काही शेतकऱ्यांना तर एक रुपया अशा पद्धतीने भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी 20 रुपये किलो पेक्षा जास्त आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, असे असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आम्ही साडे 12 रुपयांनी कांदा खरेदी करू तो सुद्धा 2 लाख टन. म्हणजे रब्बीचा कांदा जर आपण पाहिला तर 70 लाख टन कांदा बनतो आणि हे 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडून घेणार तर घेणार तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार. तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा रेट आमच्या शेतकऱ्यांचे वाढणार नाहीत. त्यामुळे इथे आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार आहोत. मात्र, आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. लासलगाव जे महाराष्ट्रातील ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहे त्यातली एक आहे. त्यामुळे इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आपला कांदा घेऊन येत असतो. त्यामुळे इथे शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचे हे आम्ही ठरवणार आहोत, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed