'एल निनो'मुळे अमरावती जिल्हा परिषदेचा जलसंधारणावर भर:पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कामांचे नियोजन
![]()
अमरावती जिल्ह्यात ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत जलसंधारणाच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आणि महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते. यावर्षी पाऊस अनियमित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक तहसील स्तरावर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमार्फत प्रत्येक गावात नाला खोलीकरण, शेततळे आणि इतर उपाययोजनांवर भर दिला जात आहे. लघु सिंचन विभागाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून मृत बंधारे पुनर्जीवित करणे, गॅब्रियन बंधारे तयार करणे तसेच सीएसआर निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकत्रित नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पंचायत विभागाला टप्प्याटप्प्याने स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले. या बैठकीत पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, लघु सिंचन, पंचायत, बांधकाम तसेच सामान्य प्रशासन विभागांच्या कामांचाही सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले. जलसंधारणाला मदत व्हावी या उद्देशाने, यावर्षी कोणत्याही निधीतून अनावश्यक सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत, असे शासनाचे निर्देश आहेत. सिमेंट रस्त्यांमुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला अडथळा निर्माण होतो आणि भूजल पातळी खोल जाते. त्यामुळे आवश्यकता नसलेल्या ठिकाणी सिमेंट रस्ते न बनवण्याचे शासनादेश आहेत. जिल्हा प्रशासनाचे या मुद्द्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
