राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-17t12_1779000872.jpg




महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईचा बच्चू कडू यांनी तीव्र निषेध केला. लोकशाहीत आंदोलन करणे म्हणजे गुन्हा नाही. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यावर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, अशी मागणी कडू यांनी केली आहे. तसेच, आम्ही या लढ्यात शेट्टी आणि जानकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घरचा आहेर दिला. जातीपातीच्या आंदोलनात सहभागी होणार नाही बच्चू कडू म्हणाले की, मी आता कोणत्याही जातीपातीच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि विकलांग (दिव्यांग) हे सर्वच जातींमध्ये असतात. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या चौकटीत न अडकता, व्यापक विचार ठेवून मी यापुढे केवळ शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठीच लढणार आहे. मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला की, राज्यातील दिव्यांग आणि नेत्रहीन बांधवांना मिळणारे ‘संजय गांधी निराधार योजने’चे मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, सरकारने दिव्यांगांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा; अन्यथा रखडलेल्या अनुदानासाठी दिव्यांगांच्या वतीने मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *