अमृता फडणवीसांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाणं टाळलं:मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; म्हणाल्या- रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही

0
drvdc30jweep7n4h-ezgifcom-resize_1778922581.gif




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना निमंत्रण मिळाले होते. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि हातमागाचा वारसा जागतिक स्तरावर मांडण्याची ही मोठी संधी मानली जात होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी येवला येथील कारागिरांनी अनेक महिन्यांच्या मेहनतीने खास पैठणी साडी तयार केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दौरे कमी करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन अमृता फडणवीस यांनी कान्स दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर याबाबत सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, देशहिताला सर्वांत मोठे प्राधान्य देणे हीच खरी जबाबदारी आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसारख्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा अभिमानाचा क्षण होता. महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि हातमाग परंपरा जगासमोर मांडण्यासाठी विशेष तयारीही सुरू होती. येवला पैठणी तयार करणाऱ्या कारागिरांनी अत्यंत मेहनत घेऊन ही साडी विणली होती. मात्र, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर त्यांनी हा दौरा टाळण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामागे केवळ औपचारिकता नसून देशाप्रती असलेली बांधिलकी असल्याचे अमृता फडणवीस यांनी नमूद केले. रेड कार्पेटची संधी पुन्हा मिळू शकते, पण देशाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे, असा भावनिक संदेश त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला. हा निर्णय घेणे सोपे नव्हते, कारण या संपूर्ण प्रवासात अनेक कलाकार, डिझायनर आणि कारागिरांचे प्रेम, परिश्रम आणि भावना जोडलेल्या होत्या. तरीही देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जागतिक चित्रपट आणि फॅशन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मंच मानला जातो. अनेक देशांतील कलाकार आणि प्रतिनिधी या मंचावर आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याची मोठी संधी या माध्यमातून मिळाली असती. येवला येथील कारागिरांनी तयार केलेली खास पैठणीही या कार्यक्रमासाठी आकर्षण ठरणार होती. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार झालेल्या या साडीबाबत कारागिरांमध्येही उत्सुकता होती. मात्र, अमृता फडणवीस यांनी देशहिताला अग्रक्रम देत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. देश प्रथम, ही भावना कायम महत्त्वाची अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी कारागीर, डिझायनर आणि शुभेच्छुकांचे विशेष आभार मानले आहेत. ही संपूर्ण संकल्पना साकारण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांच्याप्रती मी ऋणी आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर देश प्रथम, ही भावना कायम महत्त्वाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी यामागील राजकीय संदेशावर चर्चा सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed