मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात:एलपीजी टँकरवर कार आदळली, महिलेचा जागीच मृत्यू; दोन चिमुकल्यांसह तिघे जखमी
![]()
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. नातुनगर धरण परिसरात भरधाव वेगातील झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. नातुनगर स्टॉपजवळ हा अपघात घडला. मुंबईहून खेडच्या दिशेने जाणारी झायलो कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या दुर्घटनेत सबिया मारुख जसनाईक या 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इमरान मुरात जसनाईक, चार वर्षीय अब्दुल जसनाईक आणि सात वर्षीय सेहरा जसनाईक हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही वेळातच परिसरात मोठी गर्दी जमली होती. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धामची मोफत रुग्णवाहिका, जय हिंद ॲम्बुलन्स आणि 108 आपत्कालीन सेवेच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, वाहनाचा वेग किती होता आणि टँकर रस्त्याच्या कडेला कोणत्या परिस्थितीत उभा होता, याची चौकशी केली जात आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
