निवडणुका संपल्यावरच सरकारला गांभीर्य का सुचले?:सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनीही यावे- शरद पवार; मुख्यमंत्र्यांचेही टोचले कान
![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच केंद्र सरकारवर त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरून फटकारले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या भाषेचाही निषेध केला आहे. शरद पवार म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या नेत्यांची बैठक बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावे. याच्या आधी गेल्या 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या पण त्यातील एकाही बैठकीत पंतप्रधान नव्हते. पण एकंदर अशी स्थिती गंभीर आहे असे सांगण्याचे काम मुख्यमंत्री प्रधानमंत्री करत आहेत, तर तितक्याच गांभीर्याने सगळ्यांनी मिळून घ्यावी. देशात याआधीही अशी परिस्थिती होती पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आज मी सकाळपासून टीव्हीवर बघतोय कोणी मोटारसायकलवरुन जात आहे, कोणी चालत जात आहे, एकाने तर जाहीर केले की मी मंत्री आहे आणि माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या आता 17 वरून 8 वर आलो आहे. मला तर धक्काच बसला की 17 गाड्या होत्या आणि कमी केल्यानंतर 8 वर आणल्या. याचा अर्थ या सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोण गांभीर्याचा असला पाहिजे. अशी स्थिती या आधी देशात झाली नव्हती असे नाही, पण ठीक आहे. राहुल गांधींसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा अयोग्य शरद पवार म्हणाले, या वेळेला मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी सुद्धा आपली भाषा ही व्यवस्थित वापरली पाहिजे. राहुल गांधींच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी जे शब्द वापरले ते अयोग्य होते. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेत. विरोधी पक्ष नेता ही संवैधानिक पद आहे आणि ते लोकांमधून येत आहे. त्यामुळे अशी भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी वापरणे हे चुकीचे आहे. या संदर्भात आणखीन मला काही बोलायचे नाही. निवडणुका सुरू असताना गांभीर्य लक्षात नाही आले रुपया खाली येत आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, रुपया खाली का येतो, याचा विचार केला पाहिजे. आज इराणचा जो विषय आहे त्याचा परिणाम नक्कीच आहे. पण हा परिणाम तेवढा आहे का? निवडणुकीचे निकाल लागून गेले आणि त्यानंतर केंद्र सरकारने हे सगळे निर्णय घेतले. निवडणुका सुरू होते तेव्हा याचे गांभीर्य नव्हते आणि याची जनतेत जागृती करावी असे वाटले नाही. सोनं खरेदी न करण्याचा सल्ला चुकीचा नाही पंतप्रधान सोमनाथच्या मंदिराच्या तिथे गेले, त्याचे काही नाही. पण तिथे जाऊन जे केले, विमान उडवले, 6 विमाने त्या ठिकाणी घेऊन शो केला. परिस्थिती गंभीर आहे तर सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. सोनं खरेदी करू नका हे सांगणे याचा अर्थ एकच आहे की आपल्या रुपयाची जी वॅल्यू आहे ती घसरू द्यायची नाही. हा निर्णय चुकीचा आहे असे मी म्हणत नाही. पण एका बाजूला हे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला वेगळेच सुरू आहे.
