मोठी बातमी:मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिकसह जळगावात एटीएसचे छापे; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुण रडारवर
![]()
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई सुरू केली असून राज्यातील विविध शहरांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबवण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गँगस्टरविरोधात एटीएसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नालासोपारा, मिरारोड, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या शहरांमध्ये एटीएसने छापे टाकले आहेत. सोशल मीडियावरून शहजाद भट्टी किंवा त्याच्या डोगर गँगशी संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. या कारवाईत काही संशयितांच्या डिजिटल व्यवहारांची आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्क मोडीत काढण्यासाठी ही मोठी मोहीम असल्याचं सांगितलं जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून सध्या दुबईतून आपले नेटवर्क चालवत आहे. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही भारतीय तरुणांना तो सहजपणे आपल्या संपर्कात आणत असल्याचं उघड झालं आहे. कट्टरतावाद, हेरगिरी आणि गुन्हेगारी कारवायांकडे तरुणांना वळवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांत भारतातील काही दहशतवादी भरती आणि हेरगिरीशी संबंधित प्रकरणांमध्ये शहजाद भट्टीचे नाव समोर आले होते. त्यानंतर केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियाद्वारे तो भारतीय तरुणांशी संपर्क वाढवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने स्वतंत्र तपास सुरू केला. त्यातूनच आता राज्यभरात ही मोठी धडक कारवाई करण्यात येत आहे. एटीएसच्या तपासात काही तरुण भट्टीच्या नेटवर्कच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत. संबंधित तरुणांनी कोणत्या माध्यमातून संपर्क साधला, त्यांना कोणत्या प्रकारचे संदेश पाठवले गेले आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. काही संशयितांकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तपासणी करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. राज्यभरात एकाचवेळी कारवाई दरम्यान, शहजाद भट्टी भारतात आपले जाळे वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना प्रभावित करण्याचा त्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र एटीएसने कठोर पावले उचलत राज्यभरात एकाचवेळी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
