![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीला एकीकडे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पाटील कुटुंबाकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खुद्द त्यांच्या घरातूनच, म्हणजेच त्यांच्या सख्ख्या चुलत भावाकडून या बंडाला कडाडून विरोध झाला आहे. ओमराजेंच्या घरातूनच बंडाला विरोध खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला त्यांचे चुलत बंधू आणि धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना (उबाठा) सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी थेट विरोध दर्शवला आहे. मकरंद राजेंनी मोठा गौप्यस्फोट करत सांगितले की, “ओमराजेंचे महिनाभरापासून बंडाचे प्लॅनिंग सुरू होते. त्यांनी माझ्याशी यावर चर्चाही केली होती, पण मला हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण २०२९ लाही सहज निवडून येऊ, पण त्यांनी माझे ऐकले नाही.” गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राजकारण करणारे हे दोन भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ठाकले आहेत. मकरंद राजेंनी स्पष्ट केले की, “मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरायला तयार आहे.” धाराशिवमध्ये आता ‘भावाविरुद्ध भाऊ’ अशी लढत पाहायला मिळणार आहे. लवकरच उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार असून, संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार असल्याचे मकरंद राजेंनी सांगितले. “ओमराजेंनी पक्ष सोडला तरी शिवसैनिक ठाकरेंसोबतच राहतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. छोट्या टॉमीला वाचवणे म्हणजे विकास नाही; अर्चना पाटलांचा टोला २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात लढलेल्या आणि त्यांच्या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी ओमराजेंचे महायुतीत स्वागत केले; पण त्याचवेळी त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीकाही केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, “छोटे छोटे जॅक आणि टॉमी वाचवणे, किंवा कोणाला बसमध्ये सीट मिळवून देणे म्हणजे विकास नसतो. लोकसभा निवडणुकीत लोक भावनिक झाले किंवा मी कुठेतरी कमी पडले, त्यामुळे माझा पराभव झाला. पण आता महायुतीत आल्यावरच धाराशिवचा विकास होईल, हे त्यांना (ओमराजेंना) पटले असेल, तर त्यांचे स्वागत आहे.” पक्षांतरावर बोलताना त्या म्हणाल्या, “जेव्हा आम्ही पक्ष बदलला होता, तेव्हा आम्हाला ‘गद्दार’ वगैरे म्हटले गेले होते. आता त्यांनीच सांगितले आहे की पक्ष बदलून महायुतीत येणे हाच खरा विकास असतो. भाजपमध्ये ‘पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः’ हे शिकवले जाते. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी दिल्यास, महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही ओमराजेंचाही कसोशीने प्रचार करू,” असेही पाटील म्हणाल्या. सीबीआय अपील आणि पवनराजे हत्याकांडावर भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी नुकतेच म्हटले होते की त्यांचा पाटील कुटुंबाशी संघर्ष सुरूच राहील. यावर अर्चना पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. “पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने आणि जनतेने आम्हाला निर्दोष ठरवले आहे. कोणीतरी बोंबीच्या देठापासून ओरडले म्हणून कोणी खुनी होत नसतो. त्याला पुरावे लागतात. जर आम्ही खून केलेलाच नाही, तर आम्हाला न केलेल्या गुन्ह्याबद्दल फाशीला तर चढवणार नाहीत.” ओमराजेंच्या सीबीआय अपिलाच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या, “सीबीआयने उच्च न्यायालयात (High Court) अपील केले, तरीही तिथेही आम्हाला विश्वास आहे की आम्ही निर्दोषच सुटू.” ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पाटील कुटुंबाशी राजकीय दिलजमाई होण्याची शक्यता धुसर असली तरी, आता त्यांच्याच घरातून सुरू झालेला विरोध ओमराजेंसाठी एक मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे.
शिंदे गटात जाण्याची प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होती:ओमराजे निंबाळकर खोटं बोलल्याचा भावाचा दावा; अर्चना पाटलांनीही दिली तिखट प्रतिक्रिया
