मेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता 9 वर पोहोचली
![]()
मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेळघाटातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कढाव गावात पाण्याचा कोणताही स्थानिक स्रोत उपलब्ध नाही. यापूर्वीच चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे कढावच्या समावेशाने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सीईओ गांधी यांनी मेळघाट भागाची वास्तविकता जाणून घेण्यासाठी नुकताच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या. वारंवार सूचना देऊनही अधिकारी उपाययोजना करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. या तक्रारींची दखल घेत सीईओ गांधी यांनी ग्रामपंचायत निधीतून विहिरींचे खोलीकरण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे, तसेच बोरवेलमध्ये अतिरिक्त पाइप बसवण्याचे आदेश दिले. ही कामे पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कढाव येथील भेटीनंतर सीईओ गांधी यांनी ढाकणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला. तसेच, सावऱ्या येथे पाणीपुरवठ्याची स्थिती तपासली. बोरिखेडा येथे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना तोट्या बसवून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने, गट विकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी पंचायत यांना गावात पाठवून पुढील पाच दिवसांत समस्या सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा, संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईओ सत्यम गांधी यांनी दिला. दुर्गम आदिवासी भागांतील पाणीटंचाई लक्षात घेता, सुरू असलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेणे हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. विविध योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सेवांची पडताळणीही यावेळी करण्यात आली. चिखलदरा तालुक्यात यापूर्वीच सेमाडोहसह आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांमध्ये दिवसातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा केला जातो. सध्या एकूण १९ टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून, आता कढावचाही त्यात समावेश झाला आहे.
