ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख
![]()
सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होत. वेदनांशी मेत्री करणारा कवी म्हणून त्यांची ओळख होती. माधव पवार यांच्या निधनामुळे सोलापूरच्या साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक हळवा आणि जनसामान्यांचा कवी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माधव पवार यांनी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३५ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. नोकरी सांभाळून त्यांनी आपले साहित्यप्रेम जोपासले. त्यांचे ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’ हे काव्यसंग्रह रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना २१ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘स्वागत गीत’ लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. स्वरांचा साज आणि साधेपणाची ओढ माधव पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक सुरेश वाडकर, आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढवला आहे. “सोपी कविता लिहिणे हेच सर्वात अवघड काम असते,” असे ते नेहमी म्हणायचे. आपल्या वडिलांकडून मिळालेला साध्या आणि सोप्या कवितेचा वारसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. “कविता सामान्य जनतेला समजेल अशीच असावी,” हा त्यांचा आग्रह त्यांच्या प्रत्येक रचनेत दिसून यायचा. आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार माधव पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच सोलापूरसह राज्यभरातील साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळी ‘मोदी स्मशानभूमी’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
