दिखाऊ भक्ती नको, जीवनात सेवाभाव सतत जिवंत ठेवा:हभप पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन, पाथर्डीत अभिष्टचिंतन सोहळा
![]()
पाथर्डी देवाला देव पण सुद्धा संतांनी दिले आहे. संत महंतांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. ईश्वराकडून फक्त कृपा मागा. सेवाभाव सतत जिवंत ठेवा. दिखाऊ भक्ती ईश्वराला आवडत नाही. माधव बाबांसारखे मूर्तीमंत वैराग्य असलेल्या संतांचा सहवास सुद्धा भाग्याने मिळतो. संसाराचे रडगाणे गात जीवन संपवण्यापेक्षा ईश्वराचे गोडवे गात सेवा कार्याला वाहून घेत कल्याण साधावे, असे प्रतिपादन पारस महाराज मुथा यांनी केले. शंकर महाराज मठाचे संस्थापक माधव बाबा यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त व शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्र मंडळाच्यावतीने कालिका मंगल कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंगेश ओझा, बाळासाहेब लाहोटी, नगराध्यक्ष अभय आव्हाड, कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे, नगरसेवक नंदकुमार शेळके, सत्यानंद सरस्वती महाराज, मोहन महाराज सुडके, दादासाहेब मर्दाने, संजय वारे, अमोल सोळसे आदी उपस्थित होते. शंकर महाराज भक्त मंडळ, माधव बाबा भक्त मंडळ व रामनाथ बंग मित्र मंडळ व परिवाराच्यावतीने कार्यक्रम पार पडला. शंकर महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक महापूजा महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. ते पुढे म्हणाले, श्रद्धा भाव, पवित्रता याशिवाय ईश्वराला माणसाकडून काहीही लागत नाही. तेवढे सोडून आपण सर्व काही देण्यासाठी धडपडतो. त्या बदल्यात त्याच्याकडून भरपूर मोबदल्याची अपेक्षा ठेवतो. न मागता देतो तो ईश्वर असे समजा. ईश्वरी कृपा, संत कृपा याकडे सर्वात अगोदर लक्ष द्या. वाचनाअभावी कुटुंबात संस्कार राहिले नाहीत. संस्काराअभावी नीतिमत्ता राहिली नाही. नीतिमत्ता संपत चालल्याने धर्मावर ग्लानी आली आहे. धर्म निस्तेज झाल्याने समाज म्हणजे पर्यायाने माणूस सुद्धा निस्तेज होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका दिपाली बंग यांनी केले. सूत्रसंचालन शंकर पंडित यांनी केले तर आभार माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते. माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्र मंडळातर्फे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला.
