शिवरायांचा इतिहास बदलण्याचे पाप कोणी केले?:बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त विधानावर जयंत पाटलांचा सवाल, सरकारवरही निशाणा
![]()
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील मराठी बांधवांचे आणि देशवासीयांचे अस्मितास्थान असल्याने त्यांच्या इतिहासावरून वारंवार सामाजिक आणि वैचारिक संघर्ष उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे. इतिहासाची सोयीस्कर मांडणी करण्यावरून होणाऱ्या वादात आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संदर्भात केलेल्या विधानाची भर पडली असून, यावरून नवा वाद पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील म्हणाले, अलीकडे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची पदोपदी संधी काही लोक शोधत आहेत. राज्याचे प्रमुख स्टेजवर असताना बागेश्वर बाबाने काही चुकीचे दाखले दिले. महाराजांच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. पुढच्या काही वर्षांमध्ये इतिहास अशाच पद्धतीने लिहिला जाईल. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बादळण्याचे हे पाप कोणी केले हे शोधून काढावे लागेल, असे पाटील म्हणाले. एनसीईआरटीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला आहे. याच्या निषेधार्थ सांगलीत मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चामध्ये जयंत पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाष्य करत सरकारवर टीका केली आहे. आजकाल काहीतरी विषयावरून खडा टाकायचा आणि लोक काय करतात हे पहायचे, अशी वृत्ती पसरत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण केलेला वाद आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे निर्माण झालेली परिस्थिती, या पार्श्वभूमीवरजयंत पाटील यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली.
