महाराजांबद्दल कोणतेही अपशब्द खपवून घेणार नाही:रितेश देशमुखने फटकारले; धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-26t114955908_1777184361.jpg




महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत, असे त्याने स्पष्ट केले आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सध्या त्यांच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी भव्य चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर असून, या प्रवासात त्यांनी भिवंडीतील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठाला भेट देत महाआरती केली. यावेळी माध्यमांशी बोलताना रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित करत स्पष्ट केले की, महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही आक्षेपार्ह शब्द किंवा विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत. जरी त्याने आपल्याला सध्या सुरू असलेल्या विशिष्ट वादांची सखोल माहिती नसल्याचे नमूद केले, तरी महाराजांच्या थोरवीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कृत्याचा त्याने जाहीर निषेध करत शिवप्रेमींच्या भावनांना वाट करून दिली. तसेच रितेश देशमुखने ट्विट करत देखील टीका केली आहे. तो म्हणाला, कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज. या भेटीदरम्यान रितेशने भिवंडीतील भव्य मंदिराचे आणि त्यातील कलाकृतींतून साकारलेल्या प्रेरक शिवइतिहासाचे मनापासून कौतुक केले. शिवरायांच्या जाज्वल्य प्रेमापोटी इतके देखणे शक्तीपीठ उभारल्याबद्दल त्याने शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, भविष्यातही या पवित्र स्थळी वारंवार येण्याचा मानस व्यक्त केला. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणाऱ्या आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली अढळ निष्ठा आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed