85 वाद्यांच्या तालामध्ये रंगले "फोक आख्यान’:लोककलेच्या सादरीकरणातून प्रेक्षक मंत्रमुग्ध, बार्शीचा प्रतिसाद,
![]()
श्री भगवंत महोत्सव अंतर्गत ‘दि फोक आख्यान’ कार्यक्रमाने सांस्कृतिक वैभवाचा भव्य आविष्कार साकारला. पारंपरिक ८५ वाद्यांच्या निनादात आणि लोककलेच्या सादरीकरणातून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. डीजे आणि रिमिक्सच्या युगात पारंपरिक लोकसंगीताचा ठेका अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली आणि कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, भाजपा नेते मल्हार पाटील, दिग्विजय बागल, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलिंद कल्याणशेट्टी, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, आख्यान प्रमुख हर्ष कथले व विजय, प्रशांत कथले, बाजार समिती सभापती विजय गरड तसेच शाहूराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रणवीर राऊत म्हणाले, २०१८ पासून सुरू झालेल्या भगवंत महोत्सवात युवकांना जाणीवपूर्वक संधी दिली जात आहे. यंदाचा संपूर्ण कार्यक्रम युवकांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहभागातून उभा केला आहे. महोत्सवासाठी सुमारे १ ते सव्वा कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले असून बार्शीतील दानशूर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली आहे. तर मल्हार पाटील म्हणाले, भगवंत महोत्सवाचे कौतुक करत भविष्यातही असे चांगले कार्यक्रम माजी आ राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होतील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात युवक, युवती, महिला सर्वजण पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर थिरकले. श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती बार्शी व श्री भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम होत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक श्रीधर कांबळे यांनी केले, तर भगवंत देवस्थानचे सरपंच दिलीप बुडख यांनी भगवंत लोकोत्सव” या संकल्पनेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन मंगेश दहीहांडे यांनी केले. हलगी, ढोल, ताशा, झांज, खंजिरी, बासरीचे सूर या वेळी ‘गोपाळा रे गोपाळ’, ‘राधे राधे’, ‘हे माय पंढरी उभी राही…’, ‘विठू रखुमा’ अशा पारंपरिक अभंग आणि लोकगीतांच्या सादरीकरणावर उपस्थित तरुण-तरुणी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठेका धरला. हलगी, ढोल, ताशा, झांज, खंजिरी, बासरी यांसारख्या वाद्यांच्या गजराने वातावरण भारावून गेले.
