बारामतीत 2029 साठी जय पवारांची चर्चा रंगली:उमेदवारीवर जय यांनी दिलं थेट उत्तर; बारामतीत पुढचा वारस कोण? राजकारण तापलं
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात असल्या, तरी पुढील 2029 च्या निवडणुकीसंदर्भात चर्चांना आता वेग आला आहे. विशेषतः जय पवार यांच्या नावाभोवती भविष्यातील नेतृत्वाची चर्चा रंगताना दिसत आहे. कार्यकर्त्यांमध्येही जय पवार यांना पुढे आणण्याची मागणी जोर धरू लागल्याचे चित्र आहे. गुरुवारी मतदानाच्या दिवशी जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदान केंद्रावर उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना 2029 च्या निवडणुकीबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, 2029 मध्ये मी उमेदवार व्हावा, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकारणात नवा रंग भरला आहे. मात्र, स्वतःच्या भूमिकेबाबत बोलताना जय पवार यांनी नम्रता दाखवत वेगळीच भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करत राहायचे आहे. लोकांची सेवा करत राहणे आणि सर्वांना मदत करणे हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि स्वतःची भूमिका यामध्ये त्यांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. दरम्यान, मतदानाबाबत बोलताना जय पवार यांनी बारामतीकरांच्या उत्साहाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या वेळी लोकांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. मोठ्या प्रमाणात मतदान होईल, अशी आम्हाला आशा आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी सर्व पोलिंग एजंट्सशी संपर्क साधला असून मतदानाची टक्केवारी 85 ते 90 टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबतही जय पवार आशावादी दिसले. दादांनी जसं प्रेम मिळवलं, तसंच प्रेम वहिनींनाही मिळेल. त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, किती मतांनी विजय होईल याबाबत बोलताना त्यांनी सावध भूमिका घेत, ते निकालानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले. भविष्यात बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत – रोहित पवार याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनीही 2029 च्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यात बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना अशी लढत नको आहे, पण काहीजण त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काळात बारामतीतील राजकारण अधिकच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
