108 रुग्णवाहिका सेवेने 5.46 लाख अपघातग्रस्तांना जीवनदान:महाराष्ट्रात कठीण परिस्थितीत तातडीचे उपचार देत नवा टप्पा
![]()
महाराष्ट्रामध्ये ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेने आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या सेवेमुळे आतापर्यंत ५ लाख ४६ हजार १० अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून रुग्णांना तातडीचे उपचार देणे आणि त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात या सेवेने मोठे यश मिळवले आहे. ही सेवा ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) द्वारे महाराष्ट्रात संचालित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही यंत्रणा २४ तास वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहे. बीव्हीजीने सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात देशात आपले स्थान निर्माण केले असून, ही सेवा महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरमध्येही यशस्वीपणे राबवली जात आहे. ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेचा सर्वाधिक फायदा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यांना झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख २१ हजार ६८५ अपघातग्रस्तांना या सेवेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत. दुर्गम भागात, जिथे पोहोचणे आव्हानात्मक असते, तिथे ही सेवा खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, तेथे २१ आपत्कालीन पथके २४ तास तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना तातडीची मदत देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. बीव्हीजीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, आरोग्य विभागाने सोपवलेली जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडत आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या शौर्याबद्दल लवकरच या ‘वीर योद्ध्यांचा’ विशेष गौरव करण्यात येणार आहे.
