निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा:जोरदार घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा केला विरोध; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल!
![]()
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली होती. निसर्गाची हानी झाल्याने निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरले असून आज त्यांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच, नाशिक महानगरपालिकेने रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचा दावा करत पंचवटीतील नांदूर गाव ते जत्रा चौक (197 वृक्ष) आणि पेठ रोड ते नीलगिरीबाग (387 वृक्ष) अशा एकूण 584 वृक्षांच्या कत्तलीचा नवा प्रस्ताव जाहीर केला आहे. या प्रस्तावित वृक्षतोडीसाठी प्रशासनाकडून संबंधित झाडांवर लाल खुणा करण्यात आल्या असून काही ठिकाणी प्राथमिक खोदकामासही सुरुवात झाली आहे. दरम्यान, या निर्णयावर आपल्या हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. यावेळी अनेक निसर्गप्रेमी संघटनांनी हरकती नोंदवल्या होत्या. त्यांनंतर आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ‘नाशिक इज गेटिंग हॉटर दॅन माय एक्स’ असे लिहिलेले एक बॅनर देखील या मोर्चाच्या वेळी एका निसर्गप्रेमी तरुणाने दाखवले. तसेच अनेकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. वृक्षतोडीमुळे नाशिकच्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या वृक्षतोडीला अनेक कलाकारांनी देखील विरोध दर्शवला आहे.
