Maharashtra Weather | राज्यात अल निनोचं सावट! हवामान विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा
Maharashtra Weather | राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत असून विदर्भ आणि मराठवाडा परिसर अक्षरशः तापला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. काही भागांत पुढील ४८ तासांत हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी एकूणच उष्णतेचा प्रभाव कायम आहे.
दरम्यान, येणाऱ्या मान्सूनबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. India Meteorological Department (IMD) च्या प्राथमिक अंदाजानुसार, यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसावर परिणामाची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल निनोचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो. मात्र, जर सकारात्मक Indian Ocean Dipole (IOD) विकसित झाला, तर पावसावरील नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
सरकारची तयारी सुरू
या पार्श्वभूमीवर Devendra Fadnavis यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला कृषी, जलसंपदा, वित्त आणि पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण’ यांसारख्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले असून, पाणी साठवणूक वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, चारा टंचाई टाळण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय विशेष पथके तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदा कमी पाऊस हा आणखी एक मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे आगामी काळात पाणी आणि शेती व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
News Title: Maharashtra Weather Forecast and Drought Mitigation Meeting
