आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट!:कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव उघड; कठोर कारवाईची मागणी
![]()
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा गंभीर दावा केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कथित रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी उघड केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुण आणि तरुणी यांच्यातील संवादातून मुलींच्या तस्करीचे भयावह वास्तव समोर आले आहे. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून मुलींना फूस लावून पुण्यात नेले जात असून यामागे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे, ज्यात काही महिलांसह अनेक लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तस्करीसाठी मुलींची नकली आधार कार्ड तयार केली जात असल्याची धक्कादायक बाबही या संवादातून उघड झाली आहे. हे काम जरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटत असले, तरी ते ‘शाप’ देणारे आहे, अशी कबुलीही त्या तरुणीने दिली असून, या प्रकारामुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्षांनी कडक कारवाईची मागणी केली असून, आदिवासी भागातील निरागस मुलींना जाळ्यात ओढून त्यांची तस्करी करणे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे म्हटले आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरत आहे. विशेष म्हणजे, व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ‘शुभम मामा’, ‘कल्याणी आत्या’ आणि ‘मजहर कुरेशी’ अशा नावांचा स्पष्ट उल्लेख असल्याने हे सर्वजण या रॅकेटचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप केला जात आहे. या धक्कादायक खुलाशानंतर आता पोलिस प्रशासनाकडून नेमकी काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ऑडिओ क्लिपमधील संवाद (दिव्य मराठी या कथित ऑडिओ क्लिपमधील संवादाची पुष्टी करत नाही) मुलगा: काय म्हणते, काय चाललंय?
मुलगी: मी पोरींना घेऊन पुण्याला कामासाठी चालले आहे.
मुलगा: अच्छा-अच्छा.
मुलगी: मी एकटी नाहीये, मग काय दहा जण नेणार का? शुभम मामा आहे ना… पोरी काढणारा (पुरवणारा).
मुलगा: शुभम मामा कोण? कुठला आहे तो?
मुलगी: आपल्याच गावातला आहे, फुकट नगरचा.
मुलगा: ते कल्याणी आत्या करते ना हे काम?
मुलगी: हो, तीच.
मुलगा: तिने काम सोडलं होतं ना?
मुलगी: नाही, सोडलं नाहीये.
मुलगा: ती आपल्या गावात घरापाशीच दिसते… कल्याणी आत्या.
मुलगी: ती आता सगळं काम मोबाईलवरूनच करते.
मुलगा: अच्छा, असं आहे का?
मुलगी: तिला या कामासाठी आधी जेल झाली होती, तेव्हापासून ती फक्त मोबाईलवरूनच सगळं हाताळते. तिचं काम नील (निकाली) झालं की ती आता जाईलच.
मुलगा: तिचा नवरा?
मुलगी: कल्याणी आत्याच्या बापाने तिचं लग्न लावून दिलं होतं, तिथून ती निघाली होती.
मुलगा: मजहर कुरेशी?
मुलगी: हो, त्याच्यासोबत करून दिलं होतं. हे फार खतरनाक काम आहे.
मुलगा: मदन कुरेशी हे काम करतो का?
मुलगी: हो, ते कुरेशी हेच काम करतात. पैसा लय भेटतो, पण लोकांची बदुआ लागते.
मुलगा: मग तुला काय वाटतं, हे चांगलं काम आहे का?
मुलगी: मला चांगलं नाही वाटत बा, मी फक्त सांगत आहे. पैसा मिळतो पण बदुआ लागते.
मुलगा: अच्छा, मग मुली काढण्यात आणि विकण्यात हे तिघे-चौघेच आहेत का?
मुलगी: बापरे! तिघे-चौघे नाही, यात लय जण आहेत. हे पूर्ण रॅकेट आहे. यात पूनम आत्या आहे, आणखी किती जण आहेत हे मी सांगूच शकत नाही.
मुलगा: बापरे! मग यात मेन (प्रमुख) कोण आहे?
मुलगी: यात कुणी एक मेन नाही, जे काम लावून देतात ते मेन आहेत. माझ्या आईची पोरगी, पूनम आत्या आणि कल्याणी आत्या काम लावून देतात. मग त्यांना घेऊन जावं लागतं. त्यासाठी आधार कार्ड लागतं, माझ्या आईचं नकली आधार कार्ड बनवलं आहे… आणि आता मम्मी पुण्याला चालली आहे.
