![]()
ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर यांच्यावर केलेल्या अत्यंत तिखट टीकेला आता त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे उभा असून, माझ्या कुटुंबावर चिखलफेक करणाऱ्या सुषमा अंधारेंना उत्तर देण्यास मी अजिबात बांधील नाही,” अशा स्पष्ट शब्दांत कृष्णा आष्टीकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी कृष्णा आष्टीकर यांना नुकतीच विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. असे असतानाही त्यांच्या वडिलांनी निष्ठा बदलल्याने सुषमा अंधारे यांनी आष्टीकर कुटुंबाला लक्ष्य केले होते. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कृष्णा आष्टीकर यांनी माध्यमांशी बोलताना अंधारेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, “सुषमा अंधारे यांनी पुण्यात बसून थेट आमच्या खानदानाचाच उद्धार केला, हे ऐकून मला अतिशय वाईट वाटले. राजकारणात वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असण्याची अनेक उदाहरणे आहेत. मुंबईत गजानन कीर्तिकर हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. मग आमच्याच बाबतीत इतकी घाई का केली जात आहे? अंधारे यांच्यासारख्या नेत्यांच्या अशाच वागण्यामुळे लोकांना राजकारणाचा वीट आला असावा.” मी मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात; वडिलांशी बोलणे नाही आपली निष्ठा केवळ मातोश्रीशीच असल्याचे अधोरेखित करताना कृष्णा आष्टीकर यांनी स्पष्ट केले की, ते पक्षनेतृत्वाच्या सातत्याने संपर्कात आहेत. “मी उद्धव ठाकरेंचाच माणूस आहे आणि भविष्यातही त्यांच्याच प्रश्नांना उत्तरे देईन. या संपूर्ण घडामोडींदरम्यान मी स्वतः मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोललो असून त्यांना प्रत्येक परिस्थितीची आणि माझ्या भूमिकेची कल्पना दिली आहे. ज्या दिवसापासून माझे वडील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फोन बंद आहे, तेव्हापासून माझा आणि त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही,” असेही त्यांनी सांगितले. शिवसैनिकांना घाई न करण्याचे आवाहन खासदार नागेश आष्टीकर यांच्या बंडखोरीनंतर नांदेडसह विविध भागांत संतप्त शिवसैनिकांनी त्यांचे पुतळे जाळत निषेध नोंदवला. या आंदोलनांवर प्रतिक्रिया देताना कृष्णा आष्टीकर म्हणाले की, “नांदेडमध्ये शिवसैनिकांनी जे आंदोलन केले, त्यात ते थोडी घाई करत आहेत. मी पक्षातच आहे आणि मी कोणतेही बंड केलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात अशी कृत्ये करू नयेत.”
मी सुषमा अंधारेंना उत्तर द्यायला बांधील नाही!:अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा; वडिलांच्या बंडखोरीनंतर कृष्णा आष्टीकरांचा संताप
