उन्हाचा कहर, आजपासून शाळा 8 ते 11:जिल्हाधिकारी आशिया यांनी दिले आदेश मे महिन्यात पारा 43 अंशांवर जाण्याचा अंदाज
![]()
शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले आहेत. ९ एप्रिलला ३४ अंशांवर असलेला पारा अवघ्या नऊ दिवसांत ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) शहराचे तापमान ४० अंशावर होते. दिवसभर कडक उन्हाबरोबर सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारपासून, १८ एप्रिल उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरतील. ९ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. १२ एप्रिलला पारा ४० अंशांवर गेला, तर १५ एप्रिलला तो ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमान ४० अंशांवर होते, मात्र उन्हाची तीव्रता कायम होती. सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात अधिकच वाढ झाली आहे.रात्रीचा उकाडा अधिक प्रमाणात जाणवत होता. यापुर्वी मार्चमध्ये ३९ अंशावर तापमान गेले होते. त्यानंतर १९,२० मार्चला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती. १ ते ३ एप्रिल या कालावधीत देखील ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर ५ एप्रिलपासून तापमानात वाढ होऊ लागली होती. का बदलले वातावरण? कमी दाबाचा पट्टा: दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ४० अंशांवरील तापमानामुळे स्थानिक पातळीवर बाष्पीभवन वेगाने होत असून अरबी समुद्राकडून आर्द्रता येत आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांच्या मिलाफामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. { तीव्र उष्णतेनंतर आता जिल्ह्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने १९ ते २१ एप्रिल दरम्यान जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. { वादळी वारे: ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. { विजांचा कडकडाट: विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. { कारण: दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे.
