ST चालनीय उत्पन्न 11,475 कोटींवर:591 कोटींचा तोटा, 31 पैकी 8 विभाग नफ्यात; परिवहन मंत्र्यांचे तोटा कमी करण्याचे स्पष्ट निर्देश

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-15t16_1776250773.png




राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत. उपलब्ध बस व मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः तोट्यातील विभागांची योग्य कारणमिमांसा करून त्यावर ठोस उपाययोजना राबवावी, असे ते म्हणालेत. आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मुख्यालयात महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या आर्थिक कामगिरीबाबत स्पष्ट भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश यावेळी दिले. दररोज 1 कोटी 60 लाख रुपयांचा तोटा ते म्हणाले, या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण चालनीय उत्पन्न 11,475 कोटी रुपये इतके नोंदविण्यात आले, तर खर्च 12,066 कोटी रुपये झाला. परिणामी महामंडळाला तब्बल 591 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. दैनंदिन सरासरी उत्पन्न 31 कोटी 40 लाख रुपये असताना, खर्च 33 कोटी रुपये इतका झाला असून दररोज सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. उर्वरित दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांची मिमांसा करावी व त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. व्यापक सुधारणा आराखडा राबवणार ज्या अधिकाऱ्यांकडे आर्थिक आणि वैधानिक अधिकार नाहीत, ते प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना पर्यायी पदस्थापना देऊन सक्षम नेतृत्व देणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चिती या तत्त्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed