आंबेडकरी तत्त्वज्ञान हा जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग-ज्येष्ठ विचारवंत खांडेकर:आंबेडकरी विचार समितीतर्फे दोन दिवसीय साहित्यिक मेजवानीचे आयोजन
![]()
प्रतिनिधी | अमरावती आंबेडकरी तत्त्वज्ञान हे जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग झाला असून त्या तत्वज्ञानाला व्यवहारात आणण्यासाठी योगदान देण्याचे महत्वाचे कार्य आताच्या पिढीने करावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी केले. साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांच्या गौरवार्थ आंबेडकरी विचार समितीतर्फे दोन दिवसीय साहित्यिक मेजवानीचे (संगीती) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या संगीतीचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक-विचारवंत मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून का.रा. वाल्देकर, इ.मो. नारनवरे, नरेंद्र शेलार, बबन चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्घाटक प्रा. डॉ. भवरे म्हणाले, आंबेडकरी चळवळ अत्यंत व्यापक आहे. अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर यांनी समकालीन प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले, आंबेडकरी विचार हा सर्वकालिक कल्याणकारी विचारांची खरी ओळख करुन देणारा विचार आहे. त्यातून नवीन समाज घडविण्याची प्रक्रिया सुरू होते. यावेळी प्रमुख अतिथींनीही आपले विचार मांडले. फुले आंबेडकरांचे विचारातून या देशाचा उत्कर्ष साधता येईल असा त्यांच्या मांडणीचा सार होता. यानिमित्ताने आंबेडकरी गझल जागर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. इ.मो .नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्याआले या कार्यक्रमात नंदकुमार दामोदरे, सुदाम सोनुले, संजय घरडे, रोशन गजभिये, देवीलाल रौराळे, अतुल ढोणे, अनिल अघम, विनोद बागडे यांनी आपल्या गझल प्रस्तुत केल्या. सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के हिने केले तर आभार कुंदा सोनुले यांनी मानले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ कवी संमेलनाने करण्यात आला. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गोविंद वाघमारे हे होते. संमेलनात बबन चहांदे, मोरेश्वर सहारे, नारायण थोरात, गौतम ढोके, गणेश लांडगे, संजय मोखडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. प्रा. सुखदेव ढाणके, नरेंद्र शेलार आदींनी आंबेडकरवादी अर्थशास्त्रीय व श्रमिक कल्याण विषयक विचारांचा परामर्श घेतला. परिसंवादाचे संचालन प्रा.डॉ. गजानन बनसोड यांनी केले. आभार सुदाम सोनुले यांनी मानले. २००० नंतरचे आंबेडकरी साहित्य इसवी सन २००० नंतरचे आंबेडकरी साहित्य या विषयावर आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी बबन चहांदे यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासपूर्ण चर्चा केल्या गेली. या परिसंवादात आंबेडकरी साहित्यातील समीक्षा व सौंदर्यशास्त्रीय लेखन या विषयावर बोलताना प्रा डॉ अशोक इंगळे यांनी इसवी सन दोन हजार नंतरचे समीक्षा लेखन व सौंदर्यशास्त्रीय लेखनाचा चिकित्सकपणे आढावा घेतला याच परिसंवादात प्रा. डॉ. भास्कर पाटील यांनी आंबेडकरी साहित्यातील वैचारिक लेखन विश्वात व्यापकपणे होणाऱ्या वैचारिक चिंतन या लेखनाचा आढावा घेतला. तर डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी इसवी सन २००० नंतरचे आंबेडकरी नाट्यलेखन व रंगभूमी याविषयी सविस्तर भाष्य केले.
