बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार:शरद पवार यांचे विधान, पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य

0
new-project-2026-04-06t175632195_1775478543.jpg




“काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली. यानंतर दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक, अशोक खरात प्रकरण, पार्थ पवार यांसह विविध मुद्द्यावर भाष्य केले. नेमके काय म्हणाले शरद पवार? माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेबाबत बोलताना शरद पवार भावूक झाले. ते म्हणाले, “अजितदादांच्या जाण्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठे दुःख झाले आहे. ते लोकांसाठी अत्यंत सक्रिय होते आणि विकासकामांत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे, हे मान्यच करावे लागेल. सध्या पवार कुटुंबात ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही बारामतीची ही पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही या निवडणुकीत कोणाचाही प्रचार करणार नाही.” राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या सभेत पक्षाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो होता. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्यांच्या पक्षाच्या बॅनरवर एनडीएच्या नेत्यांचे फोटो असण्यात काही अडचण नाही. कारण ते एनडीएमध्ये आहेत. पण राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवर पडदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही शरद पवार यांनी पडदा टाकला. “विलीनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरू होती. मात्र, सध्या आमच्या पक्षात विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. अजितदादांसोबत या संदर्भात पाच- सहा बैठका झाल्या. बैठक झाल्यावर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करायचे. भविष्यात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते की नाही आज ते सांगता येत नाही. अजित पवारांचा दृष्टिकोण आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा होता. ते गेल्यामुळे ते कंटिन्यू राहिलं नाही. त्यामुळे आता पक्षाचं काम करत राहावं अशीच भूमिका आहे.” असे ते म्हणाले. बारामती अन् राहुरी पोटनिवणुकीवर भाष्य बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेसला माघार घेण्याबाबत सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. राजकारणात पराभव झाला तरी लोक लोकांची कामे करण्यासाठीच मैदानात उतरत असतात. राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली की नाही, याची मला अद्याप माहिती नाही.” पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. याबाबत शरद पवारांना विचारले असता, “राजकारणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. खरात प्रकरणावर टिप्पणी तसेच, राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर बोलताना, शरद पवार म्हणाले, “आज राज्यात चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. एका बाजूला शाहू, फुले, आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जातात हे चिंताजनक आहेत. कोणी किती फोन केले हे माझ्या वाचनात आलं, त्यात अनेकांची नावं आहेत. त्यात राजकीय पक्षात स्थान भुषवणारे लोक आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed