खरात प्रकरणात एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी:त्यांनाच प्रमुख करा, सुषमा अंधारेंचा टोला; एकनाथ शिंदेंच्या चौकशीची केली मागणी
![]()
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “एका खासगी व्यक्तीला गोपनीय कॉल रेकॉर्ड्स कसे मिळू शकतात? हा ‘ब्रीच ऑफ प्रायव्हसी’चा (गोपनीयतेचा भंग) गंभीर प्रकार असून, दमानियांचीच चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यांनाच प्रमुख करा” असा टोला लगावला. सुषमा अंधारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक खरात प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू मांडले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांवर निशाणा साधला. नेमके काय म्हणाल्या सुषमा अंधारे? अंजली दमानिया यांनी अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांमधील संभाषणाचे तपशील एआय (AI) अॅपच्या माध्यमातून मिळवल्याचा दावा केला होता. यावर आक्षेप घेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “दमानियांच्या दाव्यानुसार, चाकणकर यांनी खरातला १७७ वेळा, तर त्यांच्या बहिणीने २३६ वेळा फोन केले. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ वेळा तर दीपक केसरकर यांनीही खरातशी संवाद साधला. हे सर्व गोपनीय तपशील दमानियांकडे आले कुठून? त्यांना हे रेकॉर्ड्स कुणी पुरवले? जर एखादी खासगी व्यक्ती इतक्या सहजपणे कुणाचेही सीडीआर काढू शकत असेल, तर हा सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.” यावेळी त्यांनी उपरोधिक टोला लगावत, ” एसआयटी शिंदेंची चौकशी करणार का? ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. सातारा ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही अनेक आरोप केले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या आधीच्या अध्यक्षा यांनी इतक्या वेळा अशोक खरातला कॉल का केला? याची माहिती समोर आली पाहिजे. या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावे मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. दमानियांना एसआयटी प्रमुख करा एकनाथ शिंदे यांच्यावर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे, असेही सुषमा अंधारे यांनी केली. एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न पडतोय. एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यामुळे त्यांनाच एसआयटीचे प्रमुख करा,” असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. नाशिकच्या पोलिस अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. “आम्ही या अधिकाऱ्याबाबत एसआयटीला माहिती दिली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, खरातची चौकशी सुरू असतानाच त्याची पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि मुलगा अचानक गायब झाले आहेत. पोलिसांच्या नजरेखाली हे कुटुंब गायब होणे अनाकलनीय आहे,” असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोटोवरही फुल्या या प्रकरणाला आता गूढ वळणही मिळाले आहे. काही लोकांच्या नावावर ‘फुल्या’ (crosses) मारण्याचे प्रकार समोर येत असल्याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी केला. “काही लोक दबक्या आवाजात बोलत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील फुल्या मारल्या गेल्या आहेत. फुल्या मारण्याचे प्रकरण काय आहे, याची आम्हाला कल्पना नाही. अशोक खरातच्या हातून कोणी अघोरी विद्या करू पाहत आहे का? तो नक्की कोण आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दीपक केसरकर आणि आर्थिक व्यवहाराचा दुवा या संपूर्ण साखळीत दीपक केसरकर हे महत्त्वाचा दुवा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. दीपक लोंढे नावाचा व्यक्ती केसरकर आणि खरात यांच्यातील आर्थिक व्यवहार सांभाळत होता, असा दावा करत त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सूचित केले.
