Vijay Wadettiwar Slams Mumbai BMC Officials Over Byculla Land Controversy

[ads1]

भायखळा येथील महापालिकेच्या जुन्या कर्मचारी वसाहतीची (बीएमसी स्टाफ क्वार्टर्स) तब्बल 80,000 चौरस फूट मोक्याची जागा कोणत्याही प्रकारची निविदा न काढता एका खासगी विकासकाच्या घशात घातल्याचा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ब

.

नेमके प्रकरण काय आहे?

भायखळा परिसरातील जुन्या बीएमसी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची सुमारे 80,000 चौरस फूट जागा ‘वाय एम अर्बन डेव्हलपर’ नावाच्या विकसकाला विकासासाठी देण्यात आली आहे. ही जागा ‘रसूलजी जीवा कंपाऊंड’ (दयाळजी जीवा कंपाऊंड) या नावाने ओळखली जाते. या पुनर्विकासासाठी महापालिकेच्या वसाहतीमधील मूळ कर्मचाऱ्यांना आधीच तिथून हलवण्यात आले आहे. कोणतीही खुली निविदा न काढता किंवा पारदर्शक प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची ही जागा थेट बिल्डरला कोणत्या नियमांच्या आधारे देण्यात आली, यामागे नेमका कोणाचा मोठा राजकीय वरदहस्त आहे, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

बिल्डरच्या रस्त्यासाठी 50 वर्षे जुन्या मराठी दुकानदारांवर दबाव

या जागेच्या समोर असलेल्या दयाळजी वेलजी चाळीतील दुकानदारांना महापालिका अधिकारी लक्ष्य करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. दयाळजी वेलजी चाळीत सुमारे 6 मराठी दुकानदार गेल्या 50 वर्षांपासून अधिकृतपणे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. विकसकाच्या जागेला मुख्य रस्त्याकडून थेट प्रवेश मिळावा आणि त्याच्या भूखंडाची बाजारभावातील किंमत कोट्यवधी रुपयांनी वाढावी, यासाठी महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे कारस्थान रचले आहे. या दुकानदारांचा बिल्डरच्या जागेशी किंवा पुनर्विकासाशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नसताना, स्वतःचे हात ओले करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी या गरीब दुकानदारांना बेकायदेशीरपणे हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईची लूट सहन करणार नाही; विजय वडेट्टीवारांचे ट्विट

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. “बीएमसी स्टाफ क्वार्टरची 80 हजार स्क्वेअर फूट जागा कुठलेही टेंडर न काढता ‘वाय एम अर्बन डेव्हलपर’ या बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ज्या दुकानदारांचा बिल्डरच्या जागेशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, त्यांना मुख्य रस्ता मिळवून देण्यासाठी महापालिकेचे अधिकारी बिल्डरचे दलाल बनून धमकावत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना आम्ही पत्र दिले आहे. मुंबईची ही लूट आम्ही अजिबात सहन करणार नाही!”

मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी

वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला असून लेखी पत्रही सादर केले आहे. “मुंबईची हक्काची जागा अशा प्रकारे बिल्डरांच्या घशात घालणे आणि मूळ स्थानिक मराठी माणसाला उद्ध्वस्त करणे खपवून घेतले जाणार नाही.” कोणत्याही परिस्थितीत दयाळजी वेलजी चाळमधील त्या 6 मराठी दुकानदारांवर अन्यायकारक किंवा बेकायदेशीर कारवाई होऊ दिली जाणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

हेही वाचा…

मराठ्यांना न्याय द्या, पण ओबीसींचे हक्क हिरावू नका: वडेट्टीवार आक्रमक; मोदींच्या वाढदिवशी तेलाचे दिवे लावण्याच्या आवाहनावरूनही सुनावले खडेबोल

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत सुरू असलेले 20 दिवसांचे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी अचानक स्थगित करून राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने मराठा समाजाला न्याय जरूर द्यावा, पण त्यांच्यासमोर झुकून ओबीसी समाजाचे वाटोळे का केले?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षण, जरांगेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप, मराठवाड्याचा दुष्काळ आणि नागपुरातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था यावरून सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *