कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस ? – VastavNEWSLive.com


घोषणांची आतषबाजी, जनतेच्या खिशाला भाजणी ; देशभक्तीच्या घोषणांत हरवलेले अर्थकारण

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात घोषणा केली की भारत दरवर्षी 100 अब्ज डॉलरची आयात अमेरिकेकडून करणार. 100 अब्ज म्हणजे साधारणपणे लाखो कोटींचा व्यवहार आणि पाच वर्षांत हा आकडा 500 अब्ज डॉलरपर्यंत जाणार. घोषणांचा गजर झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला  पण त्या टाळ्यांचा आवाज रुपयाच्या पडझडीने गिळून टाकला.

तीन दिवसांपूर्वी डॉलरचा दर 89 रुपयांच्या आसपास होता. आज तो 92 रुपयांवर पोहोचला. म्हणजे फक्त तीन दिवसांत रुपया तीन रुपयांनी घसरला. आता 100 अब्ज डॉलरच्या व्यवहारावर ही तीन रुपयांची वाढ किती कोटींमध्ये रूपांतरित होते, याचा साधा हिशोब केला तरी हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा देशावर पडतो. तीन दिवसांतच देशाला हजारो कोटींचा फटका बसू शकतो  आणि आपण मात्र जागतिक महासत्ता होण्याच्या स्वप्नात रंगून आहोत!

दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती 67 डॉलरवरून 76 डॉलरपर्यंत झेपावल्या  म्हणजे जवळपास 15-18 टक्क्यांची उसळी. कारण? Strait of Hormuz येथे तणाव. या सामुद्रधुनीतून जगातील प्रचंड प्रमाणात तेल वाहतूक होते. भारताचे सुमारे 60% पेक्षा जास्त कच्चे तेल या मार्गे येते. हा मार्गच बंद पडला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन कोणत्या डिझेलवर चालणार? आपले पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंघ पुरी  काही दिवसांपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते,भारताकडे 74 दिवसांचा तेलसाठा आहे.देशाने टाळ्या वाजवल्या. पण अचानक बातमी आली की साठा फक्त 25 दिवसांचा उरलाय! प्रश्न असा 22 दिवसांत 50 दिवसांचा साठा हवेत विरघळला का? की तो कुठल्या अदृश्य काळ्या बाजारात गेला? की आकडेच हवेतून आले होते?

आज परिस्थिती अशी आहे की इराणने फक्त रशिया आणि चीनला त्या सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीची मुभा दिल्याच्या चर्चा आहेत. भारत  जो कधीकाळी इराणचा जवळचा मित्र समजला जायचा  तो मात्र बाहेरच उभा. आता मराठी म्हण खरी ठरतेय कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस ? भारताचे १० हजार कोटींचे जहाजमालकांचे व्यवहार धोक्यात आले आहेत. नैसर्गिक वायू, खते, मिथेनॉल  यातील मोठा टक्का या मार्गावर अवलंबून आहे. खतांची आयात अडली तर सर्वसामान्य शेतकरी अडचणीत. तेल महागलं तर डिझेल महागणार, डिझेल महागलं तर प्रत्येक वस्तू महागणार. म्हणजे शेवटी फटका कुणाला? 140 कोटी भारतीयांना.

मध्यपूर्व देशांकडे जाणारी बासमती व नॉन-बासमती तांदळाची अब्जावधी डॉलरची निर्यातही याच मार्गावर अवलंबून आहे. आयात थांबली तर संकट, निर्यात थांबली तर दुहेरी संकट. आणि आपण अजूनही भाषणांच्या आभासी जगात रमलो आहोत. इराणने अरब देशांना स्पष्ट संदेश दिला अमेरिका तुमचे संरक्षण करू शकत नाही. 20व्या शतकातील लष्करी ताकद 21व्या शतकात तितकी प्रभावी राहिलेली नाही, हे त्यांनी जगाला दाखवून दिल्याचा दावा केला जातो. पण प्रश्न आपल्यासाठी वेगळा आहे आपल्या नेतृत्वाची ताकद किती?

आज प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. नगरसेवकापासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत आणि पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना विचारायला हवे की अशा अंधाऱ्या परिस्थितीत सामान्य भारतीय नागरिकांचे रक्षण कसे करणार? फक्त घोषणांनी अर्थव्यवस्था चालत नाही, आणि फक्त देशभक्तीच्या घोषणा करून पेट्रोल पंपावर दर कमी होत नाहीत. महासत्ता होण्याच्या गजरात आपण आर्थिक वास्तवाकडे डोळेझाक तर करत नाही ना? रुपया घसरतोय, तेल महागतेय, साठे आटतायत आणि आपण अजूनही सर्व काही नियंत्रणात आहे या मंत्राचा जप करतोय.

खरेच, आता जनतेने विचारायची वेळ आली आहे  विश्वास ठेवायचा किती आणि कोणावर? कारण अर्थकारणाला भावनिक भाषणांची नाही, तर ठोस धोरणांची गरज असते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *