![]()
सातारा बाजार समिती, सातारा नगरपालिका व जिल्हा प्रशासन यांनी मिळून शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीच्या जागेवर साहित्य संमेलनाचे पार्किंग केले असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून भाजी विक्री करावी लागत आहे. पार्किंगची सोय इतरत्र करावी अन्यथा सर्व शेतकऱ्यां
.
दिनांक १ ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी पार्किंगचे नियोजन हे सातारा बाजार समितीच्या जागेमध्ये केले आहे. त्यामुळे चार दिवस शेतकरी आपला शेतमाल कसा विकणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून निर्माण झाला आहे. शेतीमाल हा नाशवंत असून त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये शेतमाला मोडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या जागेमध्ये भाजी विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी आणि या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पार्किंगची सोय इतर ठिकाणी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान करून साहित्य संमेलन भरवले जात आहे. जर शेतकऱ्यांच्या विनंतीला जुमानले नाही तर सर्व शेतकरी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आंदोलन करतील. त्याचबरोबर वेळप्रसंगी सर्व शेतमाल साहित्य संमेलनाचे स्टेजवर विक्रीला घेऊन बसण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी रस्त्यावर बसावे लागत असल्याने शेतकाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सातारा बाजार समितीकडून साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या नावाखाली सातारा बाजार समितीसमोरील मोकळ्या जागेत भरवली जाणारी भाजी मंडई अचानक कोणताही पर्याय न देता बंद करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातून रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत कडाक्याच्या थंडीत भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना थेट रस्त्यावर बसून विक्री करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज सातारा बाजार समितीच्या परिसरात भाजीपाला विक्री करतात. मात्र अचानक नोटीस बजावत भाजी मंडई बंद केल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर बसण्यास भाग पाडले गेले.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे,अशी तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.या प्रकाराचा जाहीर निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे. आजच्याच आज शेतकऱ्यांना सन्मानजनक व कायमस्वरूपी पर्यायी जागा देण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजय बर्गे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. सातारा बाजार समिती, नगरपालिका व जिल्हा प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
