![]()
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण त्याला ब
.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या 53 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी त्यांना मुंबई महापालिकेचा किल्ला कोणत्याही आमिषाला बळी न पडता लढवण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण तुम्ही त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
बोगस मतदार आढळला तर फटकवा
राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या उमेदवारांना मतदानाच्या दिवशी बोगस मतदान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचेही आवाहन केले. मतदानाच्या दिवशी सत्ताधारी पक्षांकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तो तुम्ही हाणून पाडा. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर आपली 10 माणसे उभी करा. बोगस मतदान होणार नाही याची काळजी घ्या. सतर्क राहा. मतदान केंद्रावर एखादा बोगस मतदार आढळला तर त्याला जागीच फटकवून काढा. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर मुंबईतील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
राज व उद्धव ठाकरेंच्या होणार संयुक्त सभा
उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. त्यात मनसे 53 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता ठाकरे बंधूंकडून 4 तारखेला मुंबईचा वचननामा जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर उद्धव व राज ठाकरे यांच्या मुंबई व लगतच्या परिसरात संयुक्त सभा होणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी बोलताना सांगितले, ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. सध्या या वचननाम्यावर दोन्ही पक्षांकडून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे.
त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या मुंबईसह एमएमआर परिसरात संयुक्त सभा होतील. पूर्व व पश्चिम उपनगरांम्ध्येही या सभा होतील. त्यानंतर शिवतीर्थावर संयुक्त सभा होईल. मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण व डोंबिवली आणि नाशिक येथेही ठाकरे बंधूंच्या जोरदार सभा होतील. आदित्य ठाकरे व अमित ठाकरे या वचननाम्यावर काम करत आहेत, असे ते म्हणाले.
