![]()
मीरा-भाईंदरमध्ये आमची फसणूक झाली आहे. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अनेक ठिकाणी युती झाली नसल्याने आता एकमेकांव
.
प्रताप सरनाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका असतात. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार इथे चांगले निर्णय झाले आहेत. पण काही ठिकाणी फसवणूक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आमची फसवणूक झाली. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची फसवणूक झाली आहे. शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपने घेतली पाहिजे, असा सल्लाही सरनाईक यांनी दिला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या फसवणुकीच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरेकर म्हणाले, आमच्या सारख्या जबाबदार नेत्यांनी उणेदुणे काढणे योग्य नाही. जेवढे एकत्रित करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे. जिथे अडचण होती तिथे अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या असतील. अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचे वक्तव्य करणे हे महायुतीच्या हितासाठी योग्य नाही. कारण त्यांच्या वक्तव्याला उद्या आमच्याकडून उत्तर आले तर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर
राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे ते महायुतीमधील जागावाटपावरून नाराज आहेत की त्यांच्या प्रकृतीचे काही कारण आहे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री केवळ वैयक्तिक कारणास्तव या बैठकीला येऊ शकले नाहीत. असे असले तरी, जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
