संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला:विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भेट; दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे काय आहे राजकारण?
![]()
विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ सौजन्यभेट होती की यामागे आगामी राजकीय घडामोडींची एखादी नवी रणनीती आहे? याविषयी विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात विधान परिषद निवडणूक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी आपली आगामी रणनीती ठरवण्यासाठी पुढील पाऊल उचलल्याचा दावाही केला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय राऊत हे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात संवादाचा पूल म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत ठाकरे बंधूंमध्ये संवाद वाढवण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मराठी अस्मिता, मराठी माणसांचे प्रश्न आणि मुंबईतील स्थानिक मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये सहकार्याची चर्चा सुरू झाली होती. त्या काळात संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांमधील संवाद वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ठाकरे बंधूंची युती राज्यात चर्चेचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गट व मनसे यांची युती नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांभोवती केंद्रित असल्याने त्यांच्यातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष असते. अशा परिस्थितीत संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यातील आजची भेट भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये वाढलेला संवादही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या आजच्या भेटीमागे नेमका कोणता राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यातील आजच्या भेटीतून नेमके काय निष्पन्न झाले? याबाबत लवकरच अधिक स्पष्टता येईल. पण तूर्त या भेटीविषयी राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा सुरू झाली आहे.
