युद्धामुळे युरियाची टंचाई; अकोटमध्ये बंदोबस्तात खत विक्रीची वेळ:मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांच्याही क्षेत्र व उत्पादकतेत चढ-उतार- शेतकरी चिंताग्रस्त
![]()
मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एलएनजी पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी ‘नॅचरल गॅस’ हा मुख्य कच्चा माल आहे. या पुरवठा साखळीत अडथळा आल्याने भारतात युरियाची आयात मंदावली आहे. अकोट येथे शेतकरी पहाटे पाच वाजेपासून युरिया खरेदीसाठी कृषी केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. मर्यादित आवक आणि प्रचंड मागणी यामुळे अखेर शहरात पोलीस बंदोबस्तात युरिया विक्री करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता थेट शेतकऱ्यांना खते मिळण्यात या जागतिक युद्धाचा फटका बसत आहे. अकोट तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या क्षेत्रफळ व उत्पादकतेचा आढावा घेतल्यास कापूस पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत असताना सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांच्या उत्पादकतेत लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि कीड-रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांच्याही क्षेत्र व उत्पादकतेत चढ-उतार दिसून आला. एकूण खरीप क्षेत्र २०२४-२५ मध्ये ६४,६७३.५२ हेक्टर होते, तर २०२५-२६ मध्ये ते ६४,५९१.५० हेक्टर राहिले. आगामी खरीप हंगामासाठी हे क्षेत्र वाढवून ६७,८०० हेक्टर करण्याचे नियोजन आहे. कापूस वाढणार तर सोयाबीन घटले तालुक्यात कापसाचे सरासरी क्षेत्र ४५ हजार हेक्टर असून, २०२४-२५ मध्ये ४६२१० हेक्टरवर लागवड होती. २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र वाढून ४९७८१ हेक्टरपर्यंत पोहोचले. २०२६-२७ साठी कापसाचे संभाव्य क्षेत्र ५१,८०० हेक्टर आहे. उत्पादकता १८५० किलो प्रति हेक्टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ११,५०० हेक्टर आहे. २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे क्षेत्र ११,६७२.७० हेक्टर होते व उत्पादकता ११३७.०७ किलो प्रति हेक्टर होती. मात्र २०२५-२६ मध्ये क्षेत्र घटून ९,११२.८० हेक्टर झाले. उत्पादकता ७३४.४६ किलो प्रति हेक्टरपर्यंत खाली आली. तुरीचे सरासरी क्षेत्र ६,५०० हेक्टर आहे. २०२४-२५ मध्ये ६,४७९.५० हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होती. उत्पादकता १५४७.५२ किलो प्रति हेक्टर होती. २०२५-२६ मध्ये क्षेत्र ५,६६३ हेक्टरवर आले असून उत्पादकता १३५०.७२ किलो प्रति हेक्टरपर्यंत घटली. आगामी हंगामात तुरीचे क्षेत्र ६,९०० हेक्टरपर्यंत वाढवून उत्पादकता १७०० किलो प्रति हेक्टर करण्याचा मानस आहे.
