वृंदावनच्या सप्ताहासाठी 317 भाविक मथुरेकडे
![]()
अधिकमास हा हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. या पावन महिन्यात केलेल्या जप, तप, दान, तीर्थाटन आणि विशेषतः श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाने मानवाला जन्मोजन्मीचे पुण्य लाभते, असे प्रतिपादन येथील खासदार अनुप धोत्रे यांनी केले. श्री क्षेत्र वृंदावन धाम (मथुरा) येथील यमुना नदीच्या तीरावरील ज्ञानबाग, मोतीझील येथील श्री व्यंकटेश्वर आश्रम येथे ३ ते १० जून दरम्यान भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अकोला जिल्हा व परिसरातील ३१७ भाविक गंगानगर-नांदेड-अमृतस र एक्सप्रेसने मथुरेकडे रवाना झाले. अकोला रेल्वे स्थानकावर भाजप महानगर शाखेच्या वतीने महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्या अध्यक्षतेखाली या यात्रेकरू भाविकांचा भव्य सत्कार करत निरोप देण्यात आला. याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे व मान्यवरांच्या हस्ते सर्व भाविकांना श्रीफळ, शाल, औषधी किट, मोफत नाश्ता व महाप्रसाद देण्यात आला. या १२ दिवसांच्या संपूर्ण प्रवासात भाविकांना केवळ भागवत कथेचा लाभच मिळणार नाही, तर गोकुळ, बरसाना, नंदगाव, गोवर्धन परिक्रमा, आग्रा येथील ताजमहाल, लाल किल्ला आणि वृंदावनचे प्रसिद्ध प्रेम मंदिर अशा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहेत. यजमान, मुख्य कार्यक्रम या सोहळ्याचे मुख्य आयोजक अवधुत महाराज थोरवे असून, कथेचे यजमानपद रोहणा येथील गजेंद्र महाराज पांडे व प्रतिभाताई पांडे भूषवीत आहेत. अकोल्याच्या सुप्रसिद्ध कथावाचक ह.भ.प. लताताई विठ्ठलराव इंगळे (पिंप्री बझार) या आपल्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे अमृतपान करून देणार आहेत. या सोहळ्याला गुरुवर्य अशोक महाराज जायले, एकनाथ महाराज पवार, ज्ञानेश्वर महाराज जाधव आणि खोले गुरुजी यांचे विशेष सानिध्य लाभणार आहे.
