महाराष्ट्रात यंदा 98 टक्के पावसाचा अंदाज:ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचे भाकीत; पावसात मोठे खंड पडणार, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
![]()
महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर २०२६) सरासरीच्या ९८ टक्के (अधिक-उणे ५ टक्के) पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या मान्सून अंदाजाचे हे सलग २४ वे वर्ष आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या शास्त्रीय निकषांच्या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विभागांचा विचार केल्यास, कोकण विभाग (दापोली), मराठवाडा विभाग (परभणी) आणि मध्य विदर्भ विभाग (नागपूर व यवतमाळ) येथे १०० टक्के पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या ९७.६ टक्के, पश्चिम विदर्भात ९७ टक्के, तर उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात सरासरी ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. पुणे शहरात १०० टक्के पावसाचा अंदाज असून, धुळे जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी म्हणजे ९४ टक्के पावसाची शक्यता आहे. पावसात मोठे खंड पडणार; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा डॉ. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी राहणार असल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस पडेल आणि त्यानंतर काही काळ पावसाची मोठी दडी बसेल, असे संमिश्र हवामान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे व पेरणीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे, असा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.
