मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका:बच्चू कडूंचे मंत्र्यांसमोरच मोठे विधान, शिवसैनिकांना केले थेट आवाहन
![]()
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असतानाच, आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना आगामी राजकीय स्थिती व संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले. मात्र याचवेळी भाषण करताना, मंत्री जर चुकत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय राहू नका, असे अत्यंत आक्रमक विधान बच्चू कडू यांनी केल्याने हा मेळावा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. बच्चू कडू म्हणाले की, माझ्यासमोर अनेक पक्षांमध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. आमचा स्वतंत्र पक्ष होता, अनेक पक्षांमध्ये जाऊन आम्हाला आमचं स्थान निर्माण करता आले असते. पण आम्हाला एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने मर्द वाटले. त्यांच्याशिवाय दुसरा मर्द नाही त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे रात्री दोन वाजता मदतीसाठी हजर असतात. उपमुख्यमंत्री असतानाही रात्री अडीच वाजता शेतकऱ्यांना भेटणे ही एकनाथ शिंदे यांची खरी ओळख आहे. हीच ओळख आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला न्यायची आहे. मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, एक सेवाभावी माणूस आम्ही पाहत आहोत. शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा संवाद, त्याची प्रामाणिकता, त्याचे व्यक्तिमत्व नेण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. मित्रांनो तुम्ही-आम्ही सत्तेत आहोत म्हणून सुस्त राहता कामा नये. सत्तेत आहोत म्हणून काही करताच येत नाही असे जर वाटत असेल तर मंत्री जरी आपला असला तरी चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका, अशी भूमिका भविष्यात घ्यावी लागणार आहे. तसेच आमच्या धानाचे पैसे का भेटले नाहीत? धानांची खरेदी का झाली नाही अजून? अजूनही लाडक्या बहीणींचे पैसे का भेटत नाहीत? या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागणार असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी म्हटले आहे.
