मी कुठेही जाणार नाही:माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपे स्पष्टच बोलले

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-29t223046007_1780074112.jpg




महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे वाहू लागले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, भाजप प्रवेशाच्या या सुरू असलेल्या चर्चांवर खुद्द राजेश टोपे यांनी समोर येत आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवेशाच्या माझ्या बाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. मी कुठेही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मे 2026 मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना, राजेश टोपे यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र, आपल्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या या सर्व चर्चा आणि बातम्या राजेश टोपे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पक्ष सोडण्याच्या बातम्यांचे खंडन केले होते. आता पुन्हा एकदा यावर पडदा टाकत, माझ्या भाजप प्रवेशाबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार असून, मी आपला पक्ष सोडून इतर कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका टोपे यांनी मांडली आहे. प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्थापित नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश आता जवळजवळ निश्चित मानला जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 मे रोजी त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असून, त्यांना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिले यांच्यासाठी तनपुरे यांनी माघार घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. त्यामुळे आता त्यांच्या या खात्रीलायक भाजप प्रवेशाच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *