राखाडीच्या जेवणाने 22 जणांना विषबाधा!:जेवणानंतर अनेकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास, शहापूर येथील घटनेने खळबळ
![]()
राज्यात विषारी अन्न खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पुण्याच्या हडपसर येथे देखील विषारी दारू प्यायल्याने तब्बल 15 जणांचा बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘राखाडी’चे जेवण खाल्ल्याने 22 लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या 22 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील शिळ गावात तीन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीच्या ‘राखाडी’ कार्यक्रमात 22 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी आणि नातेवाईकांसाठी दुपारी जेवण बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे, जे लोक दुपारी हे अन्न जेवून गेले त्यांना कोणताही त्रास झाला नसून त्यांची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत आहे. मात्र त्यानंतर जेवलेल्या 22 जणांना या जेवणातून विषबाधा झाली. अन्न दूषित झाल्याचे सुरुवातीला कोणालाही संशय नाही दुपारी अनेक पाहुण्यांनी जेवण केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर अन्न उरले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे हे उरलेले अन्न खराब होऊ नये म्हणून ते एका थंड पाण्याच्या बादलीत ठेवण्यात आले होते. अन्न वाया जाऊ नये या हेतूने संध्याकाळी जवळचे नातेवाईक, भावकी आणि शेजाऱ्यांना बोलावून ते उरलेले जेवण देण्यात आले. जेवताना अन्नाची चव बदलल्याची किंवा ते खराब झाल्याची कोणतीही तक्रार कुणीच केली नाही, त्यामुळे अन्न दूषित झाल्याचा कुणालाही साधा संशयदेखील आला नाही. विषबाधा आणि तातडीचे उपचार जेवण झाल्यानंतर सुरुवातीला कुणालाही त्रास झाला नाही. मात्र थोड्याच वेळात अनेकांना अचानक मळमळ, उलट्या, ताप आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने सर्वत्र एकच घबराट पसरली. एकूण 22 जणांना या अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आल्यावर, सर्वांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची संख्या जास्त असल्याने जागेअभावी काहींवर जमिनीवर झोपवूनच उपचार करावे लागले. सुदैवाने, आता या सर्व रुग्णांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर असून, जीवावरचे संकट टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या रुग्णालयातील महिला आणि पुरुष वॉर्डांमधील स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
