तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎

0
240_17798085166a15b904d566d_20260526_154348.jpg




तब्बल महिनाभराच्या जीवघेण्या उकाड्यानंतर आज अमरावतीकरांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला खरा, पण त्याचसोबत महावितरणच्या ‘ढिसाळ’ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरात जवळपास सर्वच भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ १० ते १५ मिनिटे पडलेल्या या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरातल्या अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. मागील काही दिवसांपासून अमरावती शहर जणू उष्णतेच्या भट्टीत भाजून निघत होते. नागरिक जीवघेण्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. सोमवारी दुपारी शहरातल्या एक-दोन भागांत पावसाचे तुरळक थेंब पडले खरे, परंतु तो पाऊस अत्यंत अल्प असल्याने नागरिकांना उकाड्यापासून अजिबात दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे आज, मंगळवारी सर्वच भागांत कोसळलेला हा पाऊस महिनाभराच्या तीव्र उष्णतेनंतरचा ‘पहिला तात्त्पुरता दिलासादायक पाऊस’ ठरला. या पावसाने हवेत काही काळासाठी गारवा निर्माण केला आणि अमरावतीकरांनी तब्बल तीन आठवड्यानंतर दुपारच्यावेळी रस्त्यांवर काही क्षणासाठी का होईना गारव्याचा अनुभव घेतला होता. मान्सूनपूर्व नियोजन चर्चेपुरतेच केवळ १५ मिनिटांच्या सामान्य पावसाचा ताणही सहन न करू शकणारी यंत्रणा घेऊन महावितरण आगामी मान्सूनला कसे तोंड देणार, हा मोठा प्रश्न आहे. पहिल्याच पावसात उडालेला हा गोंधळ पाहता, महावितरणचे मान्सूनपूर्व नियोजन केवळ चर्चेपुरतेच आहे का? असा सवाल अमरावतीकरांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed