जनतेसाठी लढणार; सुधाकर भारसाकळे शिंदेसेनेत जाणार:काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी
![]()
अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेतृत्व तसेच काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील माहेश्वरी भवन येथे संवाद मेळाव्
.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर समर्थकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका भूमिका स्पष्ट करतांना जनतेसाठी अधिक ताकदीने लढणार असल्याचे सांगितले आहे.
दर्यापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या संवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते तसेच विविध सहकार संस्थांमधील पदाधिकारी सहभागी झाले होते. मेळाव्यात उपस्थित समर्थकांनी सुधाकर पाटील भारसाकळे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी अनेकांनी भारसाकळे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.
मेळाव्यात बोलताना भारसाकळे यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करतांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून वारंवार माझी गोची करण्यात आली. तसेच मला विश्वासात घेतले नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याला अंजनगाव – दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांमधून मोठ्या प्रमाणावर समर्थक दाखल झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती,खरेदी-विक्री संघांचे संचालक तसेच नगरपालिकांच्या नगरसेवकांनी देखील व्यासपीठावर उपस्थित राहत सुधाकर पाटिल भारसाकळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेळाव्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बच्चू कडू यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचाही उल्लेख सुधाकर भारसाकळे यांनी केला. राज्याच्या सत्ताधारी राजकारणात सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे हा मेळावा राजकीय शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा देखील परिसरामध्ये रंगत आहे.
काँग्रेसपक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरणार सहकार क्षेत्रातील मजबूत पकड, ग्रामीण भागातील जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमधील प्रभाव यामुळे सुधाकर भारसाकळे यांचा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दर्यापूर आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
