Fuel Prices | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं इंधन दरवाढीबाबत मोठं वक्तव्य!
Fuel Prices | मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. अशात केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी इंधन दरवाढ, अर्थव्यवस्था आणि जागतिक दबावांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी विश्वास आणि सकारात्मकता टिकवणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
देशात गेल्या दहा दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये 61 पैशांची तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली. या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्पादन शुल्कात कपात केल्यास सरकारला सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या महसुलाचा फटका बसू शकतो, असं सांगितलं.
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) च्या 37 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या आवाहनाचा उल्लेख केला. देशात नकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या चर्चांवर त्यांनी टीका केली. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला भीती आणि अफवांच्या वातावरणाचा धोका परवडणारा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांमध्ये शब्द आणि कृतीतून विश्वास निर्माण करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
तीन ‘F’ वर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन:
मध्यपूर्वेतील संकटाला जवळपास तीन महिने पूर्ण होत असल्याचं सांगत सीतारमण यांनी Fuel, Fertilizer आणि Forex या तीन ‘F’ वर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. जागतिक परिस्थितीमुळे खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून सोन्याच्या वाढत्या दरांमुळे परकीय चलन व्यवस्थेवरही दबाव निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
जागतिक स्तरावर अनेक आव्हानं असली तरी भारताची अंतर्गत आर्थिक परिस्थिती स्थिर आणि मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काहीजण परिस्थिती अतिशयोक्तीने मांडत असल्याचं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, देशासमोरची आव्हानं प्रामुख्याने बाह्य कारणांमुळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आर्थिक घडामोडींवर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
