मार्गदर्शन:नोकरीच्या संधींवर अवलंबून न राहता, स्वतः उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करा

0
250_17793682756a0f0153ac155_94155420346.jpg




बदलत्या काळात केवळ नोकरीच्या संधींवर अवलंबून न राहता, स्वतः उद्योजक बनून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. हाच मुख्य उद्देश केंद्रस्थानी ठेवून बार्शी तालुक्यातील शेळगांव (आर) येथे ‘छावा प्रतिष्ठान’च्या वतीने या विशेष उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील तरुण-तरुणी, महिला आणि विविध बचत गटांच्या सदस्यांमध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकतेची एक नवी चळवळ निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी राम सुतार यांनी केले. शेळगांव (आर) येथील या मेळाव्यात ग्रामीण भागातील युवक-युवती आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी कमालीचा उत्साह, जिज्ञासा आणि नवउद्योगाबद्दलची सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. या मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे येथे विविध लघुउद्योग, गृहउद्योग, तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन करण्यात आले होते, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. मेळाव्यात केवळ सरकारी योजनांची माहितीच दिली गेली नाही, तर काही यशस्वी उद्योजकांनी स्वतःचे अनुभव थेट व्यासपीठावरून मांडले. त्यांनी शून्यातून आपले उद्योग कसे उभे केले, सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांनी नेमके काय प्रयत्न केले, याची जिवंत उदाहरणे दिली. “कष्ट, सातत्य आणि योग्य नियोजन असेल तर तर कोणताही उद्योग यशस्वी होऊ शकतो, हा गुरुमंत्र मिळाल्याने उपस्थितांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढवण्यासाठी ही पायाभरणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर येथील अधिकारी राम सुतार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून या मेळाव्यात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध उद्योगविषयक योजनांची सविस्तर माहिती दिली. यावर मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन केले. नवीन उद्योग सुरू करताना आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया, बँकेचे कर्जसहाय्य, शासनाकडून मिळणारे अनुदान (सबसिडी) आणि प्रशिक्षण याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, ज्यामुळे उपस्थितांना उद्योग उभारणीबाबतची एक स्पष्ट कायदेशीर दिशा मिळाली. ग्रामीण अर्थकारणाला गती देणारा उपक्रम ग्रामीण भागात कौशल्याची कमतरता नसते, तर योग्य माहिती आणि भांडवलाची अडचण असते. जिल्हा उद्योग केंद्र आणि छावा प्रतिष्ठानने या मेळाव्याच्या निमित्ताने शासकीय योजना थेट गावकऱ्यांच्या दारात आणल्या आहेत. यामुळे बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या तरुणांना एकाच छताखाली मार्गदर्शन मिळाल्याने शेळगांव आणि परिसरात स्थानिक पातळीवर लघुउद्योगांचे जाळे निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed