काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची फेरनिवड:बबलू देशमुख ग्रामीणचे, तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड

0
def941be-4f06-4a90-8ae7-6c9d066f9e61_1779379247608.jpg




अमरावती काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली आहे. बबलू देशमुख यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांची यादी जाहीर केली. यामध्ये बबलू देशमुख आणि बबलू शेखावत यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राबवलेल्या ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडली. या अभियानांतर्गत केंद्रीय निरीक्षक हरियाणाचे आमदार अल्ताफ अहमद आणि राज्याचे निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी गेल्या महिन्यात अमरावतीत तळ ठोकला होता. या काळात त्यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी आमदार यांच्याशी ‘वन टू वन’ चर्चा केली. इच्छुकांकडून अर्ज दाखल करून घेतल्यानंतर हा अहवाल केंद्रीय नेत्यांकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या सूत्रानुसार सर्व संवर्गातील प्रत्येकाचे नाव आणि त्यांना मिळालेला कौल स्पष्ट करण्यात आला होता. त्यानुसार आज दोन्ही अध्यक्षांची नावे घोषित करण्यात आली. दरम्यान, अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी आपण स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट करत मुलाखतीदरम्यान बबलू देशमुख यांच्याच नावाला पसंती दर्शवली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यातून देशमुख यांच्याच नावाला कौल मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *