कन्नडमध्ये 16 हजार घरकुले अपूर्ण:142 गावांतील लाभार्थी हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित, पंचायत समितीचे दुर्लक्ष
![]()
गोरगरीब आणि हक्काचे छप्पर नसलेल्या गरजूंना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने विविध घरकुल योजना सुरू केल्या आहेत. मात्र कन्नड तालुक्यात या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध योजनांमधील तब्बल १६ हजार ९७ घरे अद्यापही अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. निधीची टंचाई, वाळूचा तुटवडा, प्रशासकीय समन्वयाचा अभाव यांमुळे ही घरे रखडली आहेत. लाभार्थी हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहिल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे. कन्नड तालुक्यात एकूण १४२ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या वतीने बेघरांना हक्काचा आसरा देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते. या सर्व योजनांतर्गत तालुक्यात २८ हजार ९६८ घरांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे यातील तब्बल १६ हजार ९७ घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. हप्ता मिळाल्यास लाभार्थ्यांना बांधकाम करणे सोयीचे ठरेल. मात्र प्रशासनाकडून वेळेवर हप्ता दिला जात नसल्याचा आरोप लाभार्थींकडून होत आहे. प्रधानमंत्री आवास ः २३,०१५ मंजुरी, १६ हजार ९३ अपूर्ण. रमाई आवास ः ३,९९३ मंजुरी, १ हजार ५०९ घरे अुपूर्ण. शबरी आवास ः १,२३८ मंजुरी, ५११ कामे अपूर्ण आहे. यशवंत आवास ः ४६४ पैकी ४६४ कामे रखडलेली आहेत. अटल बांधकाम योजना ः १३ घरे मंजूर असताना सध्या ६ घरे अपूर्ण स्थिती आहेत. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यांना वाळूच मिळालेली नाही. त्यामुळे तहसीलदार सारिका भगत यांना घरकुल लाभार्थ्यांची व त्यांच्या गावांची यादी सादर करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने आरक्षित केलेल्या नदी घाटातून वाळू लवकरच मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास योजना, शबरी आवास, यशवंत आवास, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत तालुक्यात २८ हजार ९६८ घरांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे यातील तब्बल १६ हजार ९७ घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. Ã लाभार्थींना तुकड्या-तुकड्यांमध्ये पैसे दिले जातात. घरकुल झाल्यावर सौर ऊर्जेसाठी ५० हजार, रोहयोतून २८ हजार, शौचालयासाठी १२ हजार असे विभागून पैसे मिळतात. लाभार्थ्यांना थेट अडीच लाख रुपयांचे अनुदान एकाच टप्प्यात दिले तर योजना वेगाने पूर्ण होईल. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. – डॉ. तृप्ती राजपूत, जि. प. सदस्य. विजकुमार पंडित, सहायक गटविकास अधिकारी, कन्नड Q. तालुक्यात किती प्रमाणात घरकुले अपूर्ण आहेत, कारणे काय? A. काही लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला. मात्र काम केले नाही. काहींना जागा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. Q. प्रशासकीय अडथळे आहेत का? A. अडीच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही. निधी मिळताच लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. Q. वाळू मोफत देण्याच्या घोषणेचे काय झाले, कार्यवाही सुरू आहे का? A. कन्नड तहसीलकडे यादी दिली आहे. लवकरच वाळू उपलब्ध होणार आहे. Q. लाभार्थ्यांसाठी जागेचा प्रश्न कधी मिटणार, प्रशासनाचे नियोजन कसे ? A. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. निर्णय होईल. Q. घरकुलासाठी लाभार्थ्यांना किती निधी मिळतो, किती टप्प्यात येतो? A. एकूण १ लाख २० हजार रुपयांचा निधी मिळतो. टप्प्याटप्प्याने वितरण होते. प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते.
