वांद्रे रेल्वे परिसरात अतिक्रमणावर हातोडा:कारवाईला स्थानिकांचा विरोध, पोलिसांवर बाटल्या फेकल्या; गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज
![]()
मुंबई येथील वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना काही ठिकाणी गोंधळ उडल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईला काही स्थानिक लोकांकडून विरोध करण्यात आला. यावेळी काही जणांनी पोलिसांवर बाटल्या, बादल्या तसेच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडूनही सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा प्रशासनाने निर्धार केल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरूच आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफ आणि जीआरपी यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरने वांद्रे येथील रेल्वे लाईनजवळील झोपडपट्ट्यांच्या अतिक्रमणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अखेर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनाने या परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाईचे हत्यार उपसले आहे. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली वांद्र्यातील ‘गरीब नगर’ झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असून, या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध करत पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू भिरकावल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. मात्र, वाढता तणाव आणि लोकांची मोठी गर्दी पाहता घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक तसेच दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपकडून जातीचा-धर्माचा तंग देण्याचा प्रयत्न- वरुण देसाई शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण देसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, भाजपकडून जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करण्यात आला आहे. त्यांनी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तेथे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम नरेटीव्ह तयार करायचा ही भाजपची जुनी स्ट्रॅटजी आहे ती परत एकदा प्रयत्न केला. जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होते, जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होते त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडून करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे. 20 टक्के अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त पश्चिम रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत झोपडपट्ट्यांच्या जागी रेल्वेचे पाच नवे प्रकल्प प्रस्तावित असल्याने, पश्चिम रेल्वेकडून या परिसरातील अतिक्रमण हटवण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईच्या पहिल्या दिवशी सुमारे 20 टक्के अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून, या भागात 500 हून अधिक झोपड्या असल्याने अतिक्रमण निर्मूलनाची ही मोहीम पुढील तीन ते चार दिवस अशीच सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
