महाराणी सईबाई म्हणजे स्वराज्यास लाभलेली प्रेमळ सावली- निर्मळ:शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
![]()
सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक पायाभरणी होती. महाराणी सईबाई निंबाळकर म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याला लाभलेल्या एक प्रेमळ आणि खंबीर सावली होत्या असे प्रतिपादन बबनराव निर्मळ यांनी केले. पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये १६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या सईबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. या ऐतिहासिक विवाह दिनाचे औचित्य साधून पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्यात संपूर्ण सभागृह शिवमय झाले होते. यानंतर महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक बबनराव निर्मळ यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव राऊत यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर सूत्रसंचालन आणि आभार श्रीकांत चिंचखेडे यांनी मानले. या सोहळ्याला सुखदेव पोटफोडे, त्र्यंबक वाघमारे, मुरलीधर झिणे, मनोज राक्षे उपस्थित होते. महाराणी सईबाई यांनी पतीच्या यशातच संपूर्ण आयुष्य वाहिले प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी महाराणी सईबाई यांच्या अद्वितीय त्यागाचा गौरव केला. ते म्हणाले, “राजकारण, अविरत संघर्ष आणि स्वराज्याच्या ध्येयाने प्रेरित वातावरणातही महाराणी सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नेहमी शांततेचा आणि विश्वासाचा मोठा आधार बनून राहिल्या. शिवछत्रपतींना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मिळालेल्या अथांग यशाचे श्रेय जसे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिकवणीला आणि मार्गदर्शनाला जाते, तितकेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या समर्पण आणि त्यागालाही जाते. स्वराज्य निर्मितीचे पवित्र कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबरीने सईबाईंनी तितक्याच समर्थपणे व धैर्याने पार पाडले. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या आपल्या पतीच्या यशातच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले.
