नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:उपमुख्यमंत्र्यांची चमचमती कार ठरली चर्चेचा विषय
![]()
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता त्याचे परिणाम राजकीय वर्तुळातही दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या दैनंदिन वापरातील वाहनांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महत्त्वाचा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या नव्या ईव्ही कारची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सोमवारपासून सुनेत्रा पवार यांनी अधिकृत दौरे आणि प्रवासासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांची नवीकोरी चमचमती सोनेरी रंगाची ईव्ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने त्याकडे प्रतीकात्मक आणि राजकीय संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यानंतर राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांनी आपल्या वाहन ताफ्यात कपात करण्यास सुरुवात केली आहे. काही मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला असून सरकारी कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च कमी करण्यावरही भर दिला जात आहे. राज्य सरकारकडून मोठे आणि खर्चिक कार्यक्रम टाळण्याचाही निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्येही नाराजी वाढताना दिसत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली. त्यानंतर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 107 रुपयांच्या पुढे गेला आहे, तर डिझेलचा दर 94 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. वाढत्या महागाईमुळे वाहनधारकांचे आर्थिक गणित कोलमडत असून पर्यायी ऊर्जेकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे ईव्ही वाहनांच्या वापरातही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांचाही ईव्हीकडे कल सुनेत्रा पवार यांनी घेतलेला हा निर्णय आता राज्यातील इतर नेत्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि वाढती महागाई या तिन्ही गोष्टींचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांचाही ईव्हीकडे कल अधिक वाढण्याची शक्यता आहे.
